पांचगणी न्यूज नेटवर्क
भिलार : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या सातारा जिल्हा सरचिटणीस पदी वैशाली भिलारे यांची निवड करण्यात आली आहे. भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष सौ. तेजस्विनी संग्राम घोरपडे यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र प्रदान केले. भिलारे यांच्या निवडीमुळे सातारा जिल्ह्यात, विशेषतः महाबळेश्वर-पाचगणी परिसरात कार्यकर्त्यांमधून आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भाजप महिला मोर्चाच्या वतीने यंदाच्या वर्षासाठी जिल्हाध्यक्ष सौ. तेजस्विनीताई घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाने जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारणीमध्ये ९ सरचिटणीस, ४६ उपाध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांचा समावेश असून, बहुजन समाजातील कर्तबगार महिलांना यात मोठे प्राधान्य देण्यात आले आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. अतुल भोसले आणि आमदार मनोज घोरपडे यांच्या प्रमुख उपस्थितीत या निवडींना अंतिम रूप देण्यात आले.
वैशाली भिलारे यांनी आजवर केलेल्या संघटनात्मक आणि सामाजिक कार्याची दखल घेऊन पक्षाने त्यांच्यावर जिल्हा सरचिटणीसपदाची मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्यासारख्या कर्तृत्ववान आणि तळागाळात काम करणाऱ्या व्यक्तीमत्वामुळे सातारा जिल्ह्यातील भाजपचे संघटन अधिक मजबूत होईल, असा विश्वास जिल्हाध्यक्ष सौ. तेजस्विनी घोरपडे यांनी नियुक्ती पत्राद्वारे व्यक्त केला आहे.
आपल्या नियुक्तीनंतर बोलताना वैशाली भिलारे यांनी पक्षनेतृत्वाचे आभार मानले असून, भारतीय जनता पार्टीचे विचार आणि सरकारच्या कल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण कटिबद्ध राहू, असा निर्धार व्यक्त केला. भिलारे यांच्या या निवडीबद्दल राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



