पांचगणी न्यूज नेटवर्क /अजित जगताप
सातारा, दि. १०: गोरगरीब आणि सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून अविरत वाटचाल करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन सातारा येथील मुख्य ‘राष्ट्रवादी भवन’ येथे अत्यंत उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात आला. यावेळचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे पक्षाच्या या गौरवशाली दिनी महिला शक्तीचा विशेष सन्मान करत, ज्येष्ठ कार्यकर्त्या श्रीमती अर्चना देशमुख यांच्या हस्ते मुख्य पक्षध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. सातारा जिल्ह्यातील पक्षाच्या वाढीमध्ये मातृशक्तीचे योगदान अतुलनीय आहे, याचीच प्रचिती या सोहळ्यातून पुन्हा एकदा आली.
या दिमाखदार सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, नरेश देसाई, महिला पदाधिकारी अर्चना देशमुख, ॲड. रणजीतसिंह जगदाळे, प्रदेश महिला सदस्य सुमित्रा जाधव, शफिक शेख, वैशाली जाधव, सुनील गाडेकर, नलिनी जाधव, युवक जिल्हाध्यक्ष समीर राजेघाडगे, विकी शिर्के, उमेश जगदाळे, युवा नेते अतुल शिंदे, संजय पिसाळ, रोहित नवसरे, उद्धव बाबर यांच्यासह जिल्ह्यातील पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पक्षाची धुरा खऱ्या अर्थाने माता-भगिनी अत्यंत सक्षमपणे सांभाळत आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये नारीशक्तीच्या विधायक आणि सकारात्मक दृष्टिकोनामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अगदी दुर्गम खेड्यापाड्यात आणि घराघरांत पोहोचला आहे. याच निष्ठेचे आणि कष्टाचे फलित म्हणून राष्ट्रवादी भवन कार्यालयात प्रातिनिधिक स्वरूपात श्रीमती अर्चना देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करून खऱ्या अर्थाने नारीशक्तीचा गौरव करण्यात आला, अशा भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या.
याप्रसंगी बोलताना युवा नेते अतुल शिंदे यांनी कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश भरला. ते म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या राजकीय वाटचालीत अनेक चढउतार, वादळे आणि सत्तांतरे पाहिली आहेत. मात्र, सत्ता असो वा नसो, सर्वसामान्य माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच रस्त्यावर उतरून संघर्ष करत आली आहे. पक्षाच्या तीव्र आंदोलनांची धास्ती घेऊन केंद्र आणि राज्य सरकारला अनेक जनविरोधी निर्णय बदलणे भाग पडले आहे.” पुढे बोलताना त्यांनी विश्वास व्यक्त केला की, “आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, स्वातंत्र्यसेनानी किसन वीर आबा, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा जपत, ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेब यांच्या कणखर नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्तेचे सुवर्णदिवस आणल्याशिवाय राहणार नाही.”
कार्यक्रमा दरम्यान गेली अनेक वर्षे पक्षाशी एकनिष्ठ राहून तळागाळात काम करणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा आवर्जून गौरव करण्यात आला. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा संकल्प करत या वर्धापन दिन सोहळ्याची सांगता झाली.



