Home » गुन्हा » वाई पोलिसांची धडाकेबाज कामगिरी: चोरीला गेलेले आणि गहाळ झालेले ५ लाख ४० हजारांचे २७ मोबाईल नागरिकांना केले परत!

वाई पोलिसांची धडाकेबाज कामगिरी: चोरीला गेलेले आणि गहाळ झालेले ५ लाख ४० हजारांचे २७ मोबाईल नागरिकांना केले परत!

पाचगणी न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी

वाई: वाई शहर आणि परिसर ही सातारा जिल्ह्यातील एक प्रमुख आणि मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. या ठिकाणी दररोज शिक्षण, रोजगार, व्यापार आणि विविध कामांसाठी हजारो नागरिकांची ये-जा असते. मात्र, गेल्या काही दिवसांत या गर्दीच्या ठिकाणी नागरिकांचे मोबाईल गहाळ होण्याचे आणि चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले होते. या गंभीर समस्येची दखल घेत वाई पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने (डीबी) अत्यंत कौतुकास्पद कामगिरी केली आहे. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी महाराष्ट्र तसेच इतर राज्यांमधून तब्बल २७ मौल्यवान मोबाईल शोधून काढले असून, सुमारे ५ लाख ४० हजार रुपये किमतीचा हा मुद्देमाल मूळ मालकांना सन्मानाने परत केला आहे.

​सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि वाई विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांनी वाई पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांना गहाळ मोबाईलच्या तक्रारींवर गांभीर्याने आणि तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार पोलीस निरीक्षक शहाणे यांनी तपास पथकाला योग्य ते मार्गदर्शन करून तपासाची चक्रे गतीने फिरवण्याचे निर्देश दिले.

​गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज आणि पोलीस कॉन्स्टेबल विशाल शिंदे यांच्या पथकाने आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि सायबर सेलचा कौशल्याने वापर केला. मोबाईल चोरीला गेल्यानंतर किंवा गहाळ झाल्यानंतर ते कुठे सक्रिय  आहेत, याचा तांत्रिक माग काढत पोलिसांनी केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर परराज्यांतूनही हे मोबाईल हस्तगत केले.

​शोधून काढलेले हे सर्व २७ मोबाईल वाई पोलीस ठाण्यात एका विशेष कार्यक्रमादरम्यान पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या हस्ते संबंधित तक्रारदारांना सुपूर्द करण्यात आले. आपले हरवलेले मोबाईल सुरक्षितपणे परत मिळाल्याचे पाहून नागरिकांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. नागरिकांनी वाई पोलिसांच्या या तत्पर आणि प्रामाणिक कामगिरीबद्दल त्यांचे जाहीर आभार मानले असून, या कारवाईमुळे जनतेचा पोलीस प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.

वाई पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सातत्यपूर्ण कामगिरी राखली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माहे जानेवारी २०२४ पासून आजतागायत वाई पोलिसांनी विविध नामांकित कंपन्यांचे एकूण ३५७ मोबाईल शोधून ते नागरिकांना सुरक्षितपणे परत केले आहेत. पोलिसांची ही सातत्यपूर्ण कामगिरी गुन्हेगारांवर वचक निर्माण करणारी ठरत आहे.

​सदरची ही धडाकेबाज कामगिरी पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली वाईचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी, तपास पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, पोलीस कॉन्स्टेबल विशाल शिंदे, हेमंत शिंदे, नितीन कदम आणि श्रावण राठोड यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी वाई गुन्हे प्रकटीकरण शाखेचे विशेष कौतुक व अभिनंदन केले आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers