पांचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी : खंडाळा येथे विश्वगंगा प्रतिष्ठान, सातारा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘मकरंद आबा पाटील चषक’ राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत महाबळेश्वर तालुक्यातील गोडवली येथील वडील-कन्येच्या जोडीने दैदीप्यमान कामगिरी करत यश संपादन केले आहे. या स्पर्धेत पुरुष गटात सचिन मालुसरे यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर महिला गटात त्यांची कन्या स्वरा मालुसरे हिने उपविजेतेपद पटकावत द्वितीय क्रमांकावर बाजी मारली.
एकूण ९ फेऱ्यांमध्ये पार पडलेल्या या अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत राज्यभरातून नामांकित बुद्धिबळपटूंनी सहभाग घेतला होता. प्रत्येक फेरीत खेळाडूंच्या डावपेचांची, बुद्धिकौशल्याची आणि एकाग्रतेची मोठी कसोटी लागली. या खडतर स्पर्धेत सचिन मालुसरे यांनी कसलेल्या रणनीतीने प्रतिस्पर्ध्यांवर मात करत पुरुष गटाचे विजेतेपद पटकावले. दुसरीकडे, स्वरा मालुसरे हिनेही अत्यंत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत महिला गटात द्वितीय क्रमांक मिळवून राज्यस्तरावर आपल्या कौशल्याचा ठसा उमटवला. एकाच कुटुंबातील वडील आणि कन्येने राज्यस्तरीय स्पर्धेत अशी उल्लेखनीय कामगिरी करण्याची ही अभिमानास्पद बाब ठरली आहे.
या यशाबद्दल पाचगणी आणि गोडवली परिसरातील नागरिकांनी, क्रीडाप्रेमींनी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी सचिन मालुसरे व स्वरा मालुसरे यांचे विशेष अभिनंदन केले आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंमध्येही योग्य प्रयत्नांनी राज्य स्तरावर चमकण्याची प्रचंड क्षमता असते, हेच या वडील-कन्येने आपल्या कामगिरीतून सिद्ध करून दाखवले आहे. या यशामुळे गोडवलीसह संपूर्ण महाबळेश्वर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.



