ब्रेक फेल झाल्याने कार थेट डोंगरावर आदळली; एअरबॅग्स उघडल्याने मोठी जीवितहानी टळली
पांचगणी न्यूज नेटवर्क
व्याहळी | महाबळेश्वर-पाचगणी या मुख्य पर्यटन मार्गावरील धोकादायक घाटात प्रवाशांच्या काळजाचा थरकाप उडवणारी एक घटना घडली आहे. महाबळेश्वरहून पर्यटनाचा आनंद घेऊन तेलंगणाकडे परत जाणाऱ्या पर्यटकांच्या कारचे ब्रेक अचानक निकामी झाले. मात्र, चालकाने दाखवलेले कमालीचे प्रसंगावधान आणि कारमधील सर्वांनी लावलेला ‘सीट बेल्ट’ यांमुळे एक मोठा भीषण अनर्थ टळला आहे. कार डोंगराच्या कड्यावर आदळल्याने एअरबॅग्स वेळेत उघडल्या आणि संपूर्ण कुटुंब थोडक्यात बचावले. या अपघातात महिला व लहान मूल किरकोळ जखमी झाले असून, ही घटना सोमवारी दुपारी चारच्या सुमारास पाचगणी घाटातील बुवासाहेब मंदिराजवळ घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणा राज्यातील सैनिकपूर येथील रहिवासी सबूजित रॉय हे आपल्या कुटुंबासह निसान कंपनीच्या कारने (क्रमांक TS 07 JT 8806) महाबळेश्वर येथे फिरण्यासाठी आले होते. निसर्गरम्य पर्यटनाचा आनंद घेतल्यानंतर ते सोमवारी दुपारी आपल्या राज्याकडे परतीचा प्रवास करत होते. पाचगणी घाटातील बुवासाहेब मंदिराजवळील तीव्र उतारावर आले असता, अचानक त्यांच्या कारचे ब्रेक निकामी झाल्याचे सबूजित रॉय यांच्या निदर्शनास आले. घाटातील खोल दरी आणि समोरून येणारी वाहने पाहता मोठा अपघात होण्याची दाट शक्यता होती.
कारचा वेग वाढत असतानाच चालकाने अत्यंत हुशारीने आणि प्रसंगावधान राखत समोरची दरी टाळण्यासाठी वाहन तातडीने उजव्या बाजूला वळवले. नियंत्रण सुटलेली कार रस्त्यालगतच्या डोंगरातील मोठ्या दगडांवर जाऊन जोरात आदळली. हा धक्का इतका मोठा होता की कारच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला. अपघातावेळी कारमध्ये सबूजित रॉय, त्यांची पत्नी आणि लहान मूल प्रवास करत होते.
हा अपघात अत्यंत भीषण होता, मात्र सुदैवाने कारमधील सर्वांनी सीट बेल्ट लावलेले होते. कार दगडावर आदळताच गाडीच्या सुरक्षा यंत्रणेतील ‘एअरबॅग्स’ तत्काळ उघडल्या गेल्या. त्यामुळे कारमधील सदस्यांना थेट लोखंडी भागाचा मार बसला नाही आणि मोठी जीवितहानी टळली. अपघातात रॉय यांच्या पत्नी व मुलाला किरकोळ दुखापत झाली असून, अपघात घडताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. जखमींना तातडीने वाई येथील बेल एअर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
पाचगणी आणि महाबळेश्वर घाटात प्रवास करताना वाहनांचे ब्रेक आणि तांत्रिक तपासणी करणे किती गरजेचे आहे, हे या घटनेवरून पुन्हा समोर आले आहे. तसेच, प्रवासात ‘सीट बेल्ट’ लावणे फॅशन नसून तो जीव वाचवणारा सुरक्षा कवच आहे, हेच या अपघाताने सिद्ध केले आहे.



