पांचगणी न्यूज नेटवर्क
कराड : जम्मू आणि काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ (LoC) एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. लष्कराच्या छावणीत झालेल्या एका अपघाती स्फोटात महाराष्ट्राच्या दोन वीरपुत्रांना वीरमरण आले आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील शहापूर येथील जवान अर्जुन राजेंद्र जाधव आणि ठाणे जिल्ह्यातील ऐरोली येथील जवान चव्हाण विक्रम बालकृष्ण यांचा समावेश आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रावर, विशेषतः सातारा आणि ठाणे जिल्ह्यांवर शोककळा पसरली आहे.
छावणीत अचानक झाला स्फोट
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नियंत्रण रेषेजवळील उरी सेक्टरमधील कमलकोट भागात जवानांची छावणी आहे. काल संध्याकाळच्या सुमारास या छावणीमध्ये अचानक एक अपघाती स्फोट झाला. हा स्फोट नेमका कशामुळे झाला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की, कर्तव्य बजावत असलेले जवान चव्हाण विक्रम बालकृष्ण आणि अर्जुन राजेंद्र जाधव हे दोघेही गंभीररीत्या जखमी झाले.
उपचारादरम्यान डॉक्टरांनी घोषित केले मृत
घटनेची माहिती मिळताच लष्कराच्या बचाव पथकाने तातडीने हालचाली केल्या. दोन्ही गंभीर जखमी जवानांना तातडीने हवाई मार्गाने (हेलिकॉप्टरद्वारे) श्रीनगरमधील बदामीबाग छावणीत असलेल्या लष्कराच्या मुख्य रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केले.
शहापूर (कराड) गावावर शोककळा
जवान अर्जुन राजेंद्र जाधव हे कराड तालुक्यातील शहापूर गावचे रहिवासी होते. त्यांच्या निधनाची बातमी काल रात्री उशिरा शहापूर आणि परिसरात समजताच संपूर्ण तालुक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अत्यंत मनमिळाऊ आणि धाडसी स्वभाव असलेल्या अर्जुन यांच्या जाण्याने जाधव कुटुंबासह संपूर्ण गावाचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे. ऐरोलीचे जवान विक्रम चव्हाण यांच्या निधनाने मुंबई-ठाणे परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे.
लष्कराकडून तपास सुरू:
दरम्यान, हा स्फोट नेमका कसा झाला? तो तांत्रिक बिघाडामुळे झाला की अन्य काही कारणांमुळे, याचा शोध घेण्यासाठी लष्कराच्या उच्च अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
शहीद जवानांचे पार्थिव कायदेशीर आणि लष्करी प्रक्रियेनंतर विशेष विमानाने त्यांच्या मूळ गावी आणले जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील.



