पाचगणी न्यूज नेटवर्क
पांचगणी : “राज्यात टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटण्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी,” अशी आक्रमक मागणी सातारा जिल्हा शिक्षण संस्था संघाचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे (पुणे) उपाध्यक्ष मा. अशोकराव थोरात यांनी केली आहे. या पेपरफुटीच्या निषेधार्थ आगामी सोमवारी प्रशासनाला निषेधाचे निवेदन देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अशोकराव थोरात यांनी सत्ताधाऱ्यांवर तीव्र शब्दांत निशाणा साधत म्हटले की, “एकीकडे महाराष्ट्र शासनाचे काही अधिकारी टीईटी परीक्षेची प्रश्नपत्रिका फोडण्यात गुंतले आहेत, तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री विरोधी पक्षातील आमदारांना फोडण्याचे राजकीय डावपेच आखण्यात व्यस्त आहेत. आज देश आणि राज्यात सलगपणे विविध परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटत असून, लाखो तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्या या प्रकाराला सर्वस्वी सत्ताधारी राज्यकर्तेच जबाबदार आहेत.”
”टीईटी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांनी खचून न जाता धीर धरावा. आता पालक, विद्यार्थी, शिक्षक आणि भावी शिक्षकांनी एकत्र येून या भ्रष्ट कारभाराबद्दल महाराष्ट्र शासनाला जाब विचारण्याची वेळ आली आहे,” असे आवाहनही थोरात यांनी केले आहे. या गंभीर प्रकरणाचा जाहीर निषेध करण्यासाठी सोमवारी शिक्षण संस्था संघ व महामंडळाच्या वतीने प्रशासनाला निवेदन सादर केले जाणार आहे.



