पांचगणी न्यूज नेटवर्क
तापोळा : महाबळेश्वर तालुक्यातील कोयना, सोळशी आणि कांदाटी खोऱ्यातील दुर्गम भागाचा विकास आणि दळणवळण अधिक सक्षम करण्यासाठी राज्य शासन पूर्ण ताकदीने पाठीशी उभे राहील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. गुरुवारी महाबळेश्वर तालुक्यातील दरेगाव दौऱ्यावर असताना त्यांनी तापोळा परिसरातील बहुप्रतिक्षित व प्रस्तावित तापोळा पुलाच्या कामाची प्रत्यक्ष स्थळावर जाऊन पाहणी केली, तसेच तापोळा या स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट देऊन येथील वैद्यकीय सेवांचा आढावा घेतला.
प्रस्तावित तापोळा पुलाच्या कामाची पाहणी करताना उपमुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून प्रकल्पाच्या सद्यस्थितीची व तांत्रिक बाबींची सविस्तर माहिती घेतली. हा पूल केवळ दोन किनाऱ्यांना जोडणारा नसून, यामुळे स्थानिक नागरिकांच्या दळणवळणाचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. शिवाय, या परिसरातील पर्यटन विकासाला एक नवी दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पाहणी दौऱ्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी तापोळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी आरोग्य केंद्रातील विविध विभागांची, औषध साठ्याची आणि रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सोयी-सुविधांची पाहणी केली. अत्यंत दुर्गम भागात राहूनही सर्वसामान्य आणि गोरगरीब रुग्णांना दर्जेदार व तत्पर सेवा पुरविल्याबद्दल त्यांनी तेथील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनापासून कौतुक केले. ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी आवश्यक असणारी अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रसामग्री व पुरेशा सुविधा टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिल्या जातील, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलिपे, बेल एअर हॉस्पिटल चे संचालक फादर टॉमी,ग्रामविकास विभागाचे विभुते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य अजित सकपाळ, महाबळेश्वर पंचायत समितीचे माजी उपसभापती संजय मोरे, शिवसागर बोट क्लबचे चेअरमन आनंद धनावडे, युवा सेना जिल्हाप्रमुख विशाल सकपाळ, तालुकाप्रमुख गणेश उतेकर, सचिन कदम, राम सकपाळ, हरेश जाधव यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपमुख्यमंत्र्यांच्या या थेट भेटीमुळे व पाहणीमुळे तापोळा परिसरातील प्रस्तावित विकासकामांना, विशेषतः पुलाच्या उभारणीला मोठी गती मिळण्याचे स्पष्ट संकेत मिळाले असून स्थानिक नागरिकांमधून अत्यंत समाधानाचे वातावरण व्यक्त केले जात आहे.



