पांचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी : पांचगणी शहरातील अंतर्गत रस्ते आणि वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनत चालला असतानाच, आता ‘बेबी पॉईंट ते संजीवन नाका’ या मुख्य अंतर्गत रस्त्यावर असलेल्या सेंट पीटर शाळेच्या परिसरातील ऐतिहासिक लाकडी कमानीमुळे नागरिकांच्या जिवाला घोर लागला आहे. अनेक वर्षांपूर्वी उभारण्यात आलेली ही लाकडी कमान सध्या अत्यंत जीर्णावस्थेत पोहोचली असून, ती कधीही कोसळण्याच्या स्थितीत आहे. आधीच अरुंद रस्ते आणि त्यातच रस्त्याच्या मध्यभागी आलेली ही कमान यामुळे या परिसरात दररोज वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असून, एखाद्या मोठ्या अपघाताची टांगती तलवार नागरिकांवर आहे.
कुजलेले खांब आणि झुकलेली कमान
अनेक वर्षांपूर्वी निसर्गरम्य पाचगणीच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी आणि शाळेची ओळख म्हणून उभारण्यात आलेली ही लाकडी कमान आज प्रशासनाच्या आणि शाळा व्यवस्थापनाच्या दुर्लक्षामुळे स्वतःच अस्तित्वासाठी संघर्ष करत आहे. या कमानीचा मुख्य लाकडी पाया (खांब) पूर्णपणे तुटला असून, पावसाच्या पाण्यामुळे लाकूड मोठ्या प्रमाणावर कुजले आहे. ही कमान आता एका बाजूला म्हणजेच थेट चालत्या रस्त्याकडे झुकली आहे. सध्या पाचगणीत पावसाळ्याचे दिवस तोंडावर असून, सह्याद्रीच्या पट्ट्यात होणारा मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे ही संपूर्ण रचना केव्हाही रस्त्यावरील वाहनांवर किंवा पादचाऱ्यांवर कोसळू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे.
वाहतूक कोंडीत भर आणि अरुंद रस्त्यांचा अडथळा
सध्या पाचगणी शहरात ठिकठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यामुळे आधीच हे रस्ते अत्यंत अरुंद झाले असून, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागताना दिसत आहेत. त्यात भर म्हणून ही झुकलेली लाकडी कमान थेट रस्त्याच्या क्षेत्रात येत असल्याने वाहने चालवताना चालकांना कसरत करावी लागत आहे. या कमानीच्या अडथळ्यामुळे ‘बेबी पॉईंट ते संजीवन नाका’ या मार्गावर दररोज वाहतूक ठप्प होत आहे.
पर्यटक आणि विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात
हा रस्ता शहरातील अत्यंत गजबजलेला आणि महत्त्वाचा मार्ग मानला जातो. याच मार्गावरून दररोज शेकडो शाळकरी विद्यार्थी पायी ये-जा करतात. तसेच पाचगणीत येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांचीही या रस्त्यावर सतत वर्दळ असते. सकाळच्या आणि दुपारच्या शाळा सुटण्याच्या वेळी तर येथे लहान मुलांची मोठी गर्दी असते. अशा गजबजलेल्या ठिकाणी जर ही कमान कोसळली, तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कमान तात्काळ हटवण्याची पालकांची व नागरिकांची मागणी
या गंभीर समस्येकडे स्थानिक नागरिक, पादचारी आणि पालकांनी शाळा व्यवस्थापनाचे व स्थानिक प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधले आहे. केवळ डागडुजी करून आता भागणार नाही, कारण या कमानीमुळे रस्ता अडवला जात आहे. त्यामुळे संभाव्य भीषण दुर्घटना टाळण्यासाठी शाळा व्यवस्थापनाने या कमानीची तांत्रिक पाहणी करून ती तिथून तात्काळ हटवावी किंवा तिची सुरक्षित जागी पुनर्बांधणी करावी, अशी तीव्र मागणी आता पाचगणीकरांमधून केली जात आहे. प्रशासनाने एखादी दुर्घटना घडण्याची वाट न पाहता वेळीच जागे व्हावे, एवढीच अपेक्षा व्यक्त होत आहे.



