पांचगणी न्यूज नेटवर्क
पांचगणी (प्रतिनिधी) : आषाढी एकादशीच्या निमित्ताने पांचगणी शहरात निघालेल्या ‘निर्मल दिंडी’तील बाल वारकऱ्यांचे श्रीराम चौकात स्थानिक व्यावसायिकांनी अत्यंत आदराने आणि उत्साहात स्वागत केले. भक्ती आणि स्वच्छतेचा संदेश देत निघालेल्या या चिमुकल्या वारकऱ्यांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी परिसरातील व्यापाऱ्यांनी एकत्र येत सर्वांना खाऊ व फराळाचे वाटप केले.
नगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांनी निर्मल दिंडीच्या माध्यमातून शहरात स्वच्छतेची मोठी चळवळ उभी केली आहे. ही दिंडी श्रीराम चौकात पोहोचताच व्यापारी वर्गाने टाळ्यांच्या गजरात बाल वारकऱ्यांचे कौतुक केले. कडक उन्हात आणि भक्तिमय वातावरणात टाळ-मृदंगाच्या तालावर ठेका धरणाऱ्या या लहानग्यांसाठी व्यापाऱ्यांनी अल्पोपहाराची सुंदर व्यवस्था केली होती. धार्मिक उत्सवाला सामाजिक भान जपणारा हा उपक्रम पाहून व्यापाऱ्यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.
या वेळी परिसरातील प्रमुख व्यावसायिक अंकुश मालुसरे, आबा कासुर्डे, यशवंत पार्टे, आनंद मगर, संतोष मोहिते, सुनील शिंदे, अमोल बिरामणे आणि श्री. मालुसरे यांच्यासह श्रीराम चौकातील स्थानिक व्यावसायिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्यापाऱ्यांच्या या आपुलकीच्या आणि आदरातिथ्याच्या उपक्रमामुळे बाल वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पसरले होते.



